पुणे : दौड तालुक्यातील एकेरीवाडी गावच्या हद्दीत जमिनीच्या जुन्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रार दिली असून, यवत पोलीस ठाण्यात एकूण 7 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सोमवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास गट क्रमांक 903 मधील सामायिक शेतजमिनीवरून हा प्रकार घडला. राहुल सतीश टुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबावर रामचंद्र चांगदेव टुले यांनी काठीने, तर निलेश रामचंद्र टुले यांनी लोखंडी गजाने वार केले. तसेच सुरेखा रामचंद्र टुले यांनी हाताने मारहाण केली. या घटनेत राहुल यांच्या आईला देखील बांबूने मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

दुसऱ्या बाजूने रामचंद्र चांगदेव टुले यांनीही पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महेश सतीश टुले आणि राहुल सतीश टुले यांनी त्यांच्या मुलावर दगडफेक केली आणि ट्रॅक्टरच्या टॉमीने मारहाण केली. तसेच निर्मला सतीश टुले आणि संध्या राहुल टुले यांनी अंगावर धावून जात मारहाण केली व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या परस्परविरोधी तक्रारींवरून यवत पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत:
पहिली बाजू: रामचंद्र चांगदेव टुले, निलेश रामचंद्र टुले आणि सुरेखा रामचंद्र टुले (सर्व रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर).
दुसरी बाजू: राहुल सतीश टुले, महेश सतीश टुले, निर्मला सतीश टुले आणि संध्या राहुल टुले (सर्व रा. एकेरीवाडी, ता. दौंड).
या भांडणात दोन्ही बाजूंचे नागरिक जखमी झाले असून पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस शिपाई ननवरे करत आहेत







