पुणे: राज्यात तापमानवाढ कायम असून, रविवार, २ मार्च रोजी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकणात उष्ण व दमट वातावरणाचा यलो अलर्ट आहे. आग्नेय उत्तर प्रदेशात देखील चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावर होत आहे. कमाल तापमानात बदल होत आहे.
राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी झळा वाढल्या आहेत. पुणे, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या भागांमध्ये उन्हाचा चटका जाणवत आहे. उर्वरित भागातही तापमानात वाढ होत आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव १७ अंश सेल्सिअस होते. येत्या ३ ते ५ मार्च दरम्यान, कोकणात उष्ण व दमट वातावरणाचा यलो अलर्ट आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे.