पुणे : राज्यातील अनेक भागांत सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसासह वादळी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

कोकणातील पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाण्यात मध्यम पावसाचा अंदाज असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. नाशिकच्या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलका ते मध्यम पाऊस, तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
संपूर्ण विदर्भात वादळी पावसाची शक्यता असून, अमरावती, अकोला आणि बुलढाणा येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अमरावतीत काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होऊ शकतो.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मेघगर्जना, वीज आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते आणि पुलांवरून पाणी वाहण्याची तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वातावरण निर्माण झाल्यास नागरिकांनी मोकळ्या मैदानात जाणे आणि झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.







