मुंबई: आतापर्यंत भारताच्या डिजिटल नकाशावर (Digital Map) गुगल मॅप्सचे (Google Maps) वर्चस्व होते, पण आता त्याला तगडी टक्कर देण्यासाठी ‘मॅपल्स’ (Mappls) हे भारतीय अॅप पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. मॅपमायइंडियाने (Map My India) विकसित केलेले हे अॅप केवळ नेव्हिगेशनपुरते मर्यादित नसून, त्यात अनेक अशी फीचर्स आहेत, ज्यामुळे ते भारतीयांसाठी गुगल मॅप्सपेक्षा ‘भारी’ ठरत आहे.

झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांच्यापासून ते थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या अॅपची प्रशंसा करत लोकांना ते वापरण्याचे आवाहन केले आहे. पण ‘मॅपल्स’मध्ये नेमके काय आहे आणि ते इतके खास का बनले आहे?
‘मॅपल्स’ मध्ये आहेत ‘हे’ महत्त्वाचे फीचर्स
१९९५ पासून कार्यरत असलेल्या मॅपमायइंडियाने जवळपास तीन दशकांच्या अनुभवातून हे अॅप विकसित केले आहे. हे अॅप खासकरून भारतीय गरजा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तयार केले आहे.
स्पीड कॅमेरा आणि सिक्युरिटी अलर्ट: या अॅपमधील सर्वात आकर्षक फीचर म्हणजे, हायवेवर ‘सिक्रेट स्पीड कॅमेरा’ कुठे लावलेला आहे याची माहिती हे अॅप युजर्सला देते. यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी मदत होते.
Mappls डिजीपिन: हे एक क्रांतिकारी फीचर आहे. ते भारताला ३.८ मीटर चौरस विभागांमध्ये विभाजित करते. याचा उपयोग करून दुर्गम आणि ग्रामीण भागातील पत्त्याचाही अचूक शोध घेता येतो. इंडिया पोस्टसोबत भागीदारी करून हे डिजीपिन देशभरातील पोस्ट ऑफिसेससाठी डिजिटल अॅड्रेस सुविधा देत आहे.
टोल खर्चाचा अंदाज: प्रवासादरम्यान येणाऱ्या टोलचा अचूक खर्च किती असेल, याचा अंदाज हे अॅप देते.
प्रायव्हसी आणि सुरक्षा: मॅपल्स अॅपमधील सर्व डेटा भारतातच (Within India) संग्रहित केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती (डेटा प्रायव्हसी) सुरक्षित राहते.
अन्य फीचर्स: यात 3D व्ह्यू, थेट वाहतूक सिग्नल पाहणे आणि बहुमजली इमारतींमधील दुकाने शोधण्यासाठी इनडोअर नेव्हिगेशनची सुविधाही उपलब्ध आहे.
गुगल मॅप्सवर भारतात अनेकदा चुकीचे मार्ग दाखवल्याबद्दल (विशेषतः तुटलेल्या पुलावर मार्ग दाखवल्याच्या घटनेनंतर) टीका होत आहे. याउलट, ‘मॅपल्स’ स्थानिक पातळीवरील डेटा आणि अपडेटवर आधारित असल्याने ते भारतीय रस्त्यांसाठी अधिक विश्वासार्ह मानले जात आहे. केंद्र सरकार आणि आयटी क्षेत्रातील दिग्गजांच्या पाठिंब्यामुळे मॅपल्स हे भारताच्या डिजिटल स्वावलंबनाचा नवा चेहरा बनत आहे.







