नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. ‘वहिनी आहेत ना…’ या टॅगलाईनच्या माध्यमातून पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत भूमिका आणि धोरणे ठरविण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर राज्य सरकारमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आली. सरकारमधील कामकाजासोबतच पक्षसंघटनेकडेही लक्ष राहावे, यासाठी त्यांनी राज्यभर दौरा करावा, अशी सूचना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार नाशिक अधिवेशनानंतर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राज्यव्यापी नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे आणण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. ‘वहिनी आहेत ना…’ या टॅगलाईनद्वारे कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेतृत्वाकडून सहकार्य मिळेल, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा दौरा करून सुनेत्रा पवार अधिकाऱ्यांसह आढावा घेणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यावरही या दौऱ्यात भर दिला जाणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर करून संघटनेला सक्रिय करण्याचाही प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्यासह सुनेत्रा पवार यांचा राज्यातील जनसंपर्क वाढविण्यावर भर राहणार आहे.






