Jalgaon Politics: जळगाव : महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालात सत्ताधारी महायुतीला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपरिषदेतील निकालाने विशेष लक्ष वेधून घेतले. येथे 77 वर्षीय जनाबाई भगवान रंधे यांनी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. Jalgaon Politics

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर जनाबाई रंधे यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. नगरपरिषद कार्यालयात पोहोचताच त्या भावूक झाल्या आणि अनेक कार्यकर्ते व नातेवाईकांच्या गळाभेटी घेतल्या. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंनी उपस्थित अनेकांना भावूक केले. हा क्षण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले होते.
जनाबाई रंधे यांचा हा विजय केवळ एक राजकीय यश नाही, तर तो जिद्द, संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे. वयाच्या 77 व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी वय हे यशाच्या आड येत नाही, हे दाखवून दिले. अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कामात सक्रिय असून स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत होत्या. याच कामाची पोचपावती म्हणून नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिल्याचे बोलले जात आहे.
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना युतीने एकूण 14 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भाजपचे योगेश पाटील नगराध्यक्षपदी निवडून आले असून, हा विजय संघटित कामाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले. नशिराबाद नगरपरिषदेतील निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






