बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Murder Plot) त्यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या हत्येच्या कटात काही मराठा समाजाचे नेतेही सामील असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणी काल दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बीडमधील बैठकीत हत्येचा प्लॅन
जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी जालन्यात मोठी बैठक झाली होती. या बैठकीत 2 ते अडीच कोटींचा (Two to Two and Half Crores) व्यवहार निश्चित करण्यात आला होता. जरांगे पाटील यांनी थेट सांगितले की, बीडमध्ये धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वंजारी समाजातील काही अधिकारी आणि ओएसडी (OSD) यांना हाताशी धरून धनंजय मुंडे हे नेत्यांविरोधात कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला.
जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी तीन पर्याय निवडण्यात आले होते:
- बदनामीचा कट: खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडीओ बनवून जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
- थेट हल्ला: हत्येचा दुसरा पर्याय थेट खून करण्याचा होता.
- अपघात किंवा घातपात: तिसरा पर्याय म्हणजे, गाडी धडकवून किंवा गोळ्या औषधांच्या मदतीने घातपात घडवण्याचा होता.
जरांगे पाटील यांनी या प्रकरणी मराठा समाजाला शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाने शांततेची भूमिका घ्यायची आहे. तुम्ही सावध नसता, तर आरक्षण मिळाले नसते.” त्यांनी पुढे सांगितले कि, “मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा.”
माझ्याकडे अनेक पुरावे
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीमुळे राज्यातील अनेक नेत्यांना धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी असाही दावा केला आहे की, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्यातील काही नेते, तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा यांच्याविषयीचे काही कॉल रेकॉर्ड्स त्यांच्याकडे पुरावा म्हणून आहेत. हे प्रकरण पोलिसांच्या तपासाधीन असल्याने, सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.







