Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रस्ता चुकल्यानंतर कार रिव्हर्स घेताना ती थेट वाहत्या कालव्यात पडली. या अपघातानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली.

ही घटना 23 फेब्रुवारीच्या रात्री घडली. मुकीद शेख आणि त्यांची पत्नी निलोफर शेख हे कोरडगावहून पिंपळवाडीकडे कारने जात होते. हदगाव येथून त्यांनी नातेवाईक अल्ताफ पठाण याला सोबत घेतले होते. प्रवासादरम्यान रस्ता चुकल्याने कार मागे घेत असताना ती कालव्यात कोसळली. वाहत्या पाण्यात कार बुडू लागली. अल्ताफ पठाण याने प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर पडण्यात यश मिळवले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बोट, दोर आणि हुक यांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. बचावासाठी धाव घेतलेल्या चांगतपुरी येथील रावसाहेब खडेकर हे देखील पाण्यात बुडाले होते.
25 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता निलोफर शेख यांचे पार्थिव किनगाव परिसरात आढळले. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 6 वाजता रावसाहेब खडेकर यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील गेवराई भागात सापडले. रात्री उशिरा मुकीद शेख यांचे पार्थिवही शोधण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.






