जालना : जालनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने आधी बायकोचा जीव घेतला आणि नंतर गळफास घेऊन स्वतःलाही संपवलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आई-वडिलांच्या जाण्याने पोर पोरकी झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक गावात ही घटना घडली. बायकोची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत आहेत. दोघांमध्ये सुरु असलेल्या वादातून नवऱ्याने बायकोच्या डोक्यात धारदार पाहर घातली. या हल्ल्यात बायकोचा जागीच मृत्यू झाला. बायकोच्या मृत्यूंनंतर घाबरलेल्या नवऱ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

समाधान आणि किर्ती असं मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. या वादातूनच समाधानने शनिवारी बायकोची हत्या केली आणि स्वतःला देखील संपवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठ्वण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.







