Politics : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. भाजप नेते व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या राजकीय प्रभावाखाली जिल्ह्यात तब्बल ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांचा समावेश असून, सिंधुदुर्गच्या राजकारणात राणे कुटुंबाची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू होताच अनेक ठिकाणी विरोधकांनी माघार घेतल्याने भाजप-शिवसेना महायुतीला थेट यश मिळाले. जिल्हा परिषदेत खारेपाटणमधून प्राची इस्वालकर, बांद्यातून प्रमोद कामत, जानवलीतून रुहिता राजेश तांबे, पडेलमधून सुयोगी रवींद्र घाडी आणि बापर्डेतून अवनी अमोल तेली हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यातील बहुतांश जागा भाजपने राखल्या असून, एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे.
पंचायत समित्यांमध्येही महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांतील विविध गणांमधून भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये कणकवली (वरवडे) येथून सोनू सावंत, देवगड तालुक्यातील पडेल, नाडण आणि बापर्डे येथून अनुक्रमे अंकुश ठूकरूल, गणेश राणे आणि संजना लाड, तसेच वैभववाडी (कोकीसरे) येथून साधना नकाशे यांचा समावेश आहे. (Politics)
या घडामोडींमुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षांची संघटनात्मक कमजोरी पुन्हा उघड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्येही राणे कुटुंबाचे वर्चस्व दिसून आले होते. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही त्याच प्रवाहाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी असल्याने येत्या काही दिवसांत आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या बिनविरोध विजयांमुळे महायुतीला मानसिक आणि राजकीय आघाडी मिळाली असून, सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.






