Kangna Ranaut Controversy: खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका असो किंवा राजकीय मुद्द्यांवर केलेली आक्रमक मतं, कंगनाने कायमच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच (Bollywood News) आणि धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. (Entertainment News)
अलिकडेच कंगना रणौतने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ‘काळी जादू’च्या आरोपांचा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने 2016 मधील एका लेखाचा उल्लेख करत सांगितले की, एका संपादकाने असा दावा केला होता की, एका पत्रकाराकडे तिच्यावर काळी जादू केल्याचे पुरावे आहेत.
इतकेच नाही, तर त्या लेखामध्ये दिवाळीच्या मिठाईमध्ये मासिक पाळीचे रक्त मिसळून लोकांना वाटले जात असल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना कंगनाने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
“जर तुमच्यात सुपरपॉवर असेल, तर तुम्हाला चेटकीण म्हटलं जातं. मलाही अनेकदा चेटकीण असं संबोधण्यात आलं. पण मी अशा लोकांसाठी कधीच स्वतःला उद्ध्वस्त केलं नाही,” असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एका मुलाखतीत ती म्हणाली, “कोणी माझ्या मासिक पाळीबाबत बोलतं, नावं ठेवतं, तेव्हा मला वाईट वाटत नाही. पण मासिक पाळीला वाईट म्हणू नका. कारण मासिक पाळीच्या रक्तात वाईट असं काहीच नसतं.” समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत तिने स्पष्ट शब्दांत या प्रकारचा निषेध केला.
कंगनाने आपल्या संघर्षाचाही उल्लेख केला. “माझ्याकडे कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नव्हती. तरीही मी स्वतःच्या मेहनतीवर करिअर उभं केलं. ते दिवसही मजेदारच होते,” असं ती म्हणाली.
दरम्यान, कंगनाचा माजी प्रियकर अध्यायन सुमन यानेही पूर्वी तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोप केला होता. 2008 ते 2009 या काळात ते रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर हे आरोप समोर आले होते.
एकूणच, कंगना रणौत पुन्हा एकदा व्यक्तिस्वातंत्र्य, समाजाची मानसिकता आणि स्त्रीविषयक दृष्टीकोन यावर मोठी चर्चा घडवून आणताना दिसत आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.







