T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारत आणि श्रीलंका (T20 World Cup) या देशांमध्ये आयोजित होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (Cricket News) मंगळवारी याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत २० संघ भाग घेणार असून, स्वरूप २०२४ टी२० वर्ल्ड कप प्रमाणेच असेल.

मुंबईत आयोजित कार्यक्रमात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हरमनप्रीत कौर, अँजेलो मॅथ्यूज आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह उपस्थित होते. पहिल्या दिवशी ७ फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका संघ आमनेसामने येणार आहेत. त्याच दिवशी वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामनेही रंगणार आहेत.
२० संघांपैकी १२ संघांना थेट पात्रता मिळाली असून, उर्वरित ८ संघांनी पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. भारत आणि श्रीलंका यजमान देश असल्याने थेट पात्र ठरले, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अमेरिका आणि अफगाणिस्तान २०२४ टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ७ संघात राहिल्याने पात्र ठरले. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे संघ टी२० क्रमवारीत पहिल्या १२ मध्ये असल्याने थेट पात्र झाले, तर कॅनडा, नेदरलँड्स, इटली, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई संघ पात्रता फेरीतून स्पर्धेत पोहोचले.
साखळी फेरीसाठी २० संघ चार गटात विभागले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून, १५ फेब्रुवारीला त्यांचा सामना कोलंबोमध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध ७ फेब्रुवारीला मुंबईत होईल. यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान यांचा एक गट आहे, तर वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश, इटली आणि नेपाळ यांचा दुसरा गट आहे. गतउपविजेते दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई आणि कॅनडा यांचा तिसरा गट आहे.
स्पर्धेचे सामने भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद शहरांमध्ये तसेच श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडीमध्ये खेळवले जातील. उपांत्य फेरी मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि कोलकातामधील ईडन गार्डन्सवर होणार असून अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्चला होईल. पाकिस्तान टीम जर अंतिम फेरीत पोहोचली तर अंतिम सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल. या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर भारताचा कर्णधार रोहित शर्मा असेल. या स्पर्धेत साखळी फेरीनंतर सुपर आठ, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना या स्वरूपात सामने खेळवले जातील.







