IND vs NZ Final : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन मजबूत संघ आमनेसामने येणार आहेत. सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी करत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला असून अंतिम सामना अहमदाबाद येथे होणार आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. (IND vs NZ Final)

सेमीफायनलमधील विजयानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः सलामीवीर संजू सॅमसन याच्या खेळीचं त्यांनी कौतुक केलं. सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत संघाला भक्कम पाया देण्यात सॅमसनची भूमिका महत्त्वाची ठरल्याचं सूर्यानं स्पष्ट केलं. टॉप ऑर्डरमधील फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने संघ व्यवस्थापन त्यांच्यावर समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनदरम्यान बोलताना सूर्यानं संघरचनेबाबतही महत्त्वाचा संदेश दिला. सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या कामगिरीवर काही टीका होत असली तरी संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं सूर्यानं स्पष्ट केलं. “आमचे टॉप 3 फलंदाज सध्या चांगली भूमिका बजावत आहेत आणि त्यांच्यात कोणताही बदल करण्याचा विचार नाही,” असं त्याने सांगितलं. तसेच शिवम दुबे याला मधल्या फळीमध्ये ‘गेम-चेंजर’ म्हणून पाठवलं होतं आणि परिस्थितीनुसार संघ रणनीती बदलण्यास तयार आहे, असंही सूर्यानं नमूद केलं.
दरम्यान, फायनलपूर्वी संघात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेतही कर्णधाराने दिले. मात्र अहमदाबादच्या मैदानावरील पीचचा स्वभाव पाहून अंतिम क्षणी रणनीतीत काही बदल केले जाऊ शकतात.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामने नेहमीच चुरशीचे ठरले आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही रोमांचक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला आता ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याची मोठी संधी असून चाहत्यांच्या अपेक्षा संघाकडून अधिकच वाढल्या आहेत.







