
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर 18 वर्षांचा दुष्काळ संपवत आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करत आयपीएलचा मुकुट प्रथमच आपल्या शिरपेचात खोवला. या विजयासह विराट कोहलीचं 18 वर्षांचं स्वप्न साकार झालं.

सामना कसा झाला?

नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB कडून विराट कोहलीने संयमी पण दमदार 43 धावांची खेळी केली. त्याला साथ दिली जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी. बंगळुरूने 20 षटकांत 190 धावांचं लक्ष्य उभारलं.पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि काईल जेमिसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत संघाला सामन्यात टिकवून ठेवलं. पण उत्तरादाखल खेळताना पंजाब किंग्सला RCB च्या भेदक आणि कडक गोलंदाजीसमोर फडफडावे लागले. सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आणि जोश हेझलवूड यांनी शानदार कामगिरी करत पंजाबचा डाव 184 धावांवर रोखला. या विजयासह RCB चं पहिलं IPL विजेतेपद अखेर त्यांच्या पदरी आलं.
विजेत्या RCB ला मिळाले ‘इतके’ कोटी रुपये!
IPL 2025 चं विजेतेपद मिळाल्यानंतर RCB संघाला BCCI कडून प्राईझ मनी म्हणून तब्बल ₹20 कोटी रुपये मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पंजाब किंग्सला ₹12.5 कोटी मिळाले.वैयक्तिक कामगिरीसाठीही अनेक खेळाडूंना मोठ्या प्रमाणात गौरवण्यात आलं. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 15 सामन्यांत 759 धावा करत ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला, तर त्याच संघातील प्रसिद्ध कृष्णा याने सर्वाधिक 25 बळी घेत ‘पर्पल कॅप’ मिळवली. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने 717 धावांसह ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार पटकावला. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने केवळ 7 इनिंग्समध्ये 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा करत ‘सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन’चा किताब मिळवला. शेवटी, सर्वाधिक शिस्तबद्ध खेळासाठी ‘फेअर प्ले अवॉर्ड’ चेन्नई सुपर किंग्स संघाला देण्यात आला.
विराट कोहलीची प्रतिक्रिया
अहमदाबादमध्ये सामना संपल्यावर समालोचक मॅथ्यू हेडनला पहिली प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, “शेवटचा बॉल टाकला गेला, तेव्हा माझा ऊर भरून आला. भावनांचा बांध फुटला.”हा विजय संघासाठीच नाही, तर चाहत्यांसाठीही महत्त्वाचा असल्याचंही विराटनं सांगितलं.”मी या टीमसाठी माझी उमेदीची वर्षं दिली, माझ्या कारकिर्दीची 18 वर्षं दिली. RCBसोबतच मला हा क्षण जगायचा होता, आणि आज तो क्षण प्रत्यक्षात उतरला आहे”







