पुणे: पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील बंद पडलेल्या (Yashwant Sugar Factory) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रक्रियेत मोठा घोळ (Ajit Pawar) झाल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे (Theur News) प्रवक्ते विलास लवांडे यांनी केले आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कारखान्याची जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी या संपूर्ण व्यवहारात सुमारे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा लवांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यशवंत बचाव सभासद कृती समितीच्या वतीने बोलताना लवांडे म्हणाले की, संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे, मृत सभासदांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, तसेच चुकीचे प्रोसिडिंग तयार करून जमीन विक्रीचा प्रयत्न केला. या प्रकरणाविरोधात ते कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला ॲड. मंगेश ससाणे आणि समिती सदस्य उपस्थित होते.
लवांडे यांनी आरोप केला की, 512 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली कारखान्याची जमीन केवळ 299 कोटी रुपयांना विकण्याचा ठराव करण्यात आला. बाजार समितीने कोणतेही नियम न पाळता 36 कोटी रुपये कारखान्याला अदा केले. विशेष म्हणजे 500 रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून व्यवहाराच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यामुळे शासनाचे मुद्रांक शुल्क बुडविण्यात आले आणि सभासदांची दिशाभूल करण्यात आली.
या व्यवहारासाठी दोन्ही संस्थांचे प्रमुख हे सख्खे भाऊ असल्याचा उल्लेख करत लवांडे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने हा व्यवहार राबविण्यात आला, ज्यामुळे कारखान्याला सरळ 200 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
दरम्यान, सभासदांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्तांकडे तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर फौजदारी गुन्ह्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या व्यवहाराची चौकशी करीत असल्याची माहितीही लवांडे यांनी दिली. त्यांनी मागणी केली की बाजार समितीने शासनाच्या आदेशाशिवाय केलेली ही जमीन खरेदी प्रक्रिया त्वरित तपासली जावी.







