Pune News : आयटी आणि शिक्षण क्षेत्रामुळे वेगाने बदलणाऱ्या पुणे शहरात विवाहसंस्थेचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालय येथे दररोज सरासरी दहा पेक्षा अधिक घटस्फोट अर्ज दाखल होत आहेत. वर्षाकाठी चार हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद होत असल्याने न्यायालयांवरील ताणही वाढला आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे ४५ टक्के घटस्फोट हे परस्पर संमतीने घेतले जात आहेत. २०२६ च्या केवळ पहिल्या ४५ दिवसांत ४४५ प्रकरणे दाखल झाली, त्यापैकी ३५० सहमतीने होती. २०२५ मध्ये २३८० प्रकरणांची नोंद झाली होती. शहरातील नऊ फॅमिली कोर्टांमध्ये दररोज सुमारे ५०० हून अधिक प्रकरणांवर सुनावणी होते; मात्र सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढणे शक्य होत नाही.
तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली हे प्रमुख कारण आहे. आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र विचारांचे पती-पत्नी नात्यातील मतभेदांवर तडजोड करण्यास कमी तयार असतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मोठ्यांचे मार्गदर्शन कमी झाले आहे. काही ठिकाणी पालकांचा अतिहस्तक्षेप, तर काही ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष वाद वाढवते. सोशल मीडियाचा प्रभाव, गोपनीयतेचे प्रश्न आणि विवाहबाह्य संबंधही कारणीभूत ठरत आहेत.
विशेष म्हणजे २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये विवाहानंतर एका वर्षातच विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, ३०-४० वर्षांचा संसार केल्यानंतर मुलं मोठी झाल्यावर वेगळे होणाऱ्या जोडप्यांची संख्याही वाढत आहे. महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता वाढल्याने अन्याय आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची प्रवृत्ती वाढली आहे, हे सकारात्मक लक्षण मानले जाते.
ही वाढती आकडेवारी केवळ न्यायालयीन ताणाची बाब नाही; ती बदलत्या सामाजिक मूल्यांचीही निशाणी आहे. तज्ज्ञ सांगतात, नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांना पर्याय नाही. वेगवान शहरी जीवनात नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.







