Pune Mumbai Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकरच्या भीषण अपघातानंतर तब्बल ३२ तास दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि राज्याच्या आर्थिक नसांना जणू लकवा बसला. आयटी कर्मचारी, रुग्णवाहिका, मालवाहतूक, पर्यटक हजारो लोक या एका घटनेमुळे अडकले. या अपघाताने केवळ वाहतूकच नाही, तर महामार्गावरील सुरक्षितता, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प जो गेली अनेक वर्षे फाईल्स, डेडलाईन्स आणि घोषणांमध्ये अडकलेला होता. खंडाळा घाटातील धोकादायक वळणं, तीव्र उतार आणि अपघातप्रवण पट्टा वगळण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

६,६९५ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खोपोली ते कुसगाव दरम्यान थेट बोगदे (टनेल) आणि उंच पूल (व्हायाडक्ट) उभारतो. परिणामी घाटमार्ग टाळला जाईल आणि मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ तब्बल २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. पण वेळेइतकंच महत्त्वाचं म्हणजे हा मार्ग आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी श्वासमार्ग ठरू शकतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातानंतर ‘मिसिंग लिंक’चे काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. “अंतर आणि वेळ वाचेलच, पण अशा संकटाच्या वेळी पर्यायी वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होईल,” असं ते म्हणाले. सध्या या प्रकल्पाचं ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं असून, पुढील चार महिन्यांत तो सुरू होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प केवळ सोयीचा नाही, तर गरजेचा आहे. ३२ तासांचा ठप्पपणा ही एक चेतावणी आहे एकच मार्ग, एकच चूक, आणि संपूर्ण यंत्रणा कोलमडते. ‘मिसिंग लिंक’ पूर्ण झाली, तर पुढचं संकट कदाचित इतकं महागात पडणार नाही.







