सासवड, ता. १६ : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे उघडकीस आली आहे. जेवण करण्यासाठी वारंवार सांगितल्याचा राग मनात धरून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना १४ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जखमी महिलेवर उपचार करण्यात आले असून आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे.

याप्रकरणी कोमल नाना जगताप (वय १९, रा. भिवरी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नाना विश्वास जगताप (वय २२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल जगताप यांचा २०२४ मध्ये समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. पती नाना जगताप हा पारंपरिक पद्धतीने दारोदारी जाऊन देवाची आरती व गाणी म्हणण्याचा व्यवसाय करतो. त्याला दारूचे व्यसन असून किरकोळ कारणांवरून पत्नीशी वारंवार वाद घालण्याची सवय असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नाना जगताप हा दारूच्या नशेत घरी आला होता. पत्नीने त्याला जेवण करण्यासाठी बोलावले आणि मोबाईल बाजूला ठेवून जेवण करण्यास सांगितले. याच कारणावरून त्याचा संताप अनावर झाला. त्याने पत्नीच्या कानशिलात थपडा मारत मारहाण केली. त्यानंतर घरात पडलेला चाकू उचलून तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करत असताना झटापटीदरम्यान कोमल यांच्या गळ्याला चाकू लागून त्या जखमी झाल्या.
आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलांनी धाव घेत भांडण सोडवले. मात्र, त्यानंतरही आरोपीने पुन्हा पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अखेर पीडित महिला घराबाहेर पडून शेजाऱ्यांच्या मोबाईलवरून आईला संपर्क साधला. त्यानंतर आई आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच आरोपी पती फरार झाला होता.
जखमी महिलेवर सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सासवड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






