मुंबई: भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेश राज्यातील कुरनूल जिल्ह्यातील जोन्नागिरी भागात सोन्याचा एक मोठा साठा सापडला आहे. खाण विभागाच्या ताज्या अहवालानुसार, या भागात तब्बल 50 टन सोन्याचा साठा उपलब्ध असल्याचे निश्चित झाले आहे. या शोधामुळे भविष्यात भारताचे परदेशातून सोने आयात करण्यावरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच दरही कमी होण्याची शक्यता आहे.

केवळ जोन्नागिरीच नव्हे, तर रामागिरी, जव्वकुला, चिगुरुकुंटा आणि बिस्नाटम अशा एकूण 4 ठिकाणांची निवड खाणकामासाठी करण्यात आली आहे. जोन्नागिरी येथे खाणकामासाठी सुमारे 1500 एकर जमीन सरकारने मंजूर केली आहे. याआधीच्या प्राथमिक सर्वेक्षणात 500 एकर परिसरात 13 टन सोने मिळण्याचा अंदाज होता. मात्र, आता उर्वरित 1000 एकर जमिनीवरही शोधकार्य सुरू असून, एकूण साठा 50 टनांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोन्नागिरी येथे सापडलेल्या या 50 टन सोन्याची बाजारातील अंदाजे किंमत 7500 कोटी ते 9000 कोटी रुपयांच्या घरात आहे. सध्या 1 टन कच्च्या खनिजावर प्रक्रिया केल्यास सुमारे 1 ग्रॅम सोने मिळते. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ करणार आहेत. भारतात सोन्याची मोठी मागणी असली तरी, कोलार गोल्ड फील्ड्स बंद झाल्यापासून देशांतर्गत उत्पादन घटले आहे.






