रांजणगाव: रांजणगाव गणपती हद्दीतील खंडाळे व पिंपरी दुमाला येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची डीपी काल रात्री चोरीला गेल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या डीपी चोरीच्या घटनांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी डीपी चोरी करणाऱ्या चोरट्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, सध्या उपलब्ध असलेल्या अल्प पाण्यावरच शेती व उदरनिर्वाह अवलंबून असल्याने, प्रशासनाने तातडीने नवीन डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात परिसरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. डीपी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.






