पुणे: महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सिकंदर शेख गेल्या काही (Sikandar Shaikh) दिवसांपासून एका वादग्रस्त सामन्यामुळे चर्चेत आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथे 17 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Maharashtra Kesari) निमित्त आयोजित मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात 11 लाख रुपयांची प्रतिष्ठेची कुस्ती रंगली. सुमारे दीड तास चाललेल्या या सामन्यात दोन्ही मल्लांनी जोरदार झुंज दिली; मात्र अखेर वादाच्या छायेत सामना बरोबरीत सुटला. (Paud News)

सामन्यादरम्यान कोकाटे यांनी सिकंदरला वारंवार कानठाळी दिल्याने वातावरण तापले. सिकंदरने ताकीद दिल्यानंतरही प्रकार थांबला नाही. याच वेळी कोकाटेचा एक समर्थक आखाड्यात उतरून सिकंदरवर धावून आल्याने गोंधळ उडाला. पंचांनी तातडीने सामना थांबवला. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला; परंतु स्पष्ट निकाल लागला नाही आणि दोन्ही मल्लांना विजयी घोषित करण्यात आले.
सिकंदर शेख यांनी माध्यमांशी बोलताना संयत भूमिका घेतली. “आमच्यात जे झालं ते रागाच्या भरात झालं. कुस्तीमध्ये शरीर तापलेलं असतं. मला कुणालाही बदनाम करायचं नाही. पण बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीचं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न दिसून आला.
कुस्ती हा महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे. आखाड्यातील स्पर्धा कितीही तापल्या तरी नियम आणि शिस्त यांना प्राधान्य दिले जाते. बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप करणे हे खेळाच्या आत्म्याला बाधा देणारे आहे. सिकंदर शेख शांत आणि तांत्रिकदृष्ट्या परिपक्व मल्ल म्हणून ओळखले जातात, तर माऊली कोकाटे यांचाही ग्रामीण भागात मोठा चाहता वर्ग आहे. या घटनेने आयोजकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रतिष्ठेच्या कुस्त्यांमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे आणि प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये कडक सुरक्षा आणि स्पष्ट नियमांची अंमलबजावणी आवश्यक ठरते. अन्यथा खेळातील रोमांचकता वादात बदलण्याचा धोका कायम राहतो.







