न्हावरे: शिरूर तालुक्यातील मांडवगण (Shirur News) फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर किरकोळ वादातून उसळलेल्या संघर्षाने थेट गोळीबाराचे रूप घेतल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत दोघेजण जखमी झाले असून, परस्परविरोधी फिर्यादींवरून शिरूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध (Pune Crime) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या मांडवगण फराटा गावातील यात्रेनिमित्त लावलेल्या बॅनर तसेच क्रिकेट स्पर्धेच्या पोस्टरवर फोटो लावण्याच्या कारणावरून सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता.हा वाद मिटवण्यासाठी गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संबंधित दोन्ही गट भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर एकत्र आले. मात्र, चर्चा सुरू असतानाच वातावरण तापले आणि वादाने हिंसक वळण घेतले.
अक्षय गोविंदा पाटील (वय २९ ,रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल आनंदा चौगुले, राहुल सुदाम गिऱ्हे आणि संदीप तेलंग (सर्व रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी वाद घालत दमदाटी केली. यावेळी संदीप तेलंग याने पिस्तूल काढून पाटील यांच्या दिशेने रोखले. झटापटीदरम्यान गोळी सुटून ती अमोल चौगुले याच्या हाताला लागली. त्यानंतर चौगुले याने पिस्तूल हिसकावून घेत अक्षय पाटील याच्या दिशेने गोळीबार केला. यात अक्षय पाटील याच्या उजव्या बरगडीला गोळी लागून तो जखमी झाला.
तर दुसऱ्या बाजूने मिथुन उर्फ अमोल आनंदा चौघुले (वय ३१) याने दिलेल्या फिर्यादीनुसार,अक्षय पाटील व त्याच्या साथीदारांनी पिस्तुलातून जीवघेणा गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोळीबारानंतर चौघुले व त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी पळत असताना, काही जणांनी दगडफेक व शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, दिगंबर शेंडकर, मिनीनाथ गव्हाणे याच्यासह काही अनोळखी व्यक्तींविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरूर पोलिसांनी दोन्ही फिर्यादींवरून विविध गंभीर कलमांच्या अंतर्गत तसेच आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बेकायदेशीर पिस्तुलांचा सुळसुळाट; कायदा-सुव्यवस्थेला धोका
शिरूर तालुक्यासह ग्रामीण भागात बेकायदेशीर पिस्तुलांची वाढती उपलब्धता ही चिंतेची बाब ठरत आहे. किरकोळ कारणांवरून थेट गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. युवकांमध्ये वाढती आक्रमकता आणि शस्त्रांचा सहज वापर यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.







