पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्याला गेल्या 24 तासांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने आज, 6 जुलै रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे महापालिका प्रशासनाने आज शहरातील व जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे.

गेल्या 20 वर्षांतील विक्रम मोडीत काढत पुण्यात रविवारी एकाच दिवसात 31.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा हा धुवांधार मारा पुढील 2 ते 3 दिवस असाच सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.

या नैसर्गिक संकटकाळात एक दिलासादायक बातमी म्हणजे खडकवासला धरण साखळी परिसरात झालेला दमदार पाऊस. गेल्या 24 तासांत या धरणांमध्ये तब्बल 1 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, जो शहरासाठी महिनाभर पुरू शकतो. सध्या धरणांमध्ये 5.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या 17.67 टीएमसीच्या तुलनेत अजूनही कमी असला, तरी सध्याच्या स्थितीत ही सकारात्मक बाब आहे.
गुंजवणी नदीला आलेल्या पुरात गावकऱ्यांनी श्रमदानातून बनवलेला कच्चा रस्ता वाहून गेल्याने सुमारे 25 गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच वरंध घाटातील उबर्डे गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यंत निकडीचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तसेच, नदी-नाले आणि दरड प्रवण क्षेत्रांपासून लांब राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे.






