पुणे: पुण्यातील (Pune News) कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन खरेदी प्रकरणावरून मोठे वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कंपनी या प्रकरणी अडचणीत आली आहे. 1,804 कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हा व्यवहार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने केला. या कंपनीचे भाग भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या व्यवहारात कंपनीला 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची माफी देखील देण्यात आली. ही जमीन ‘महार वतनी’ प्रकारची असल्याचं उघड झालं आहे. कायद्यानुसार, वतनाच्या जमिनी अहस्तांतरित असतात आणि त्याचे हस्तांतरण नियमांत बसत नाही.

सरकारी परवानगीचा अभाव
‘महार वतनी’ जमिनीच्या हस्तांतरणावर कायद्याचे निर्बंध आहेत. त्यामुळे, अशा जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी असणे अनिवार्य असते. विशेष म्हणजे, वतनाच्या जमिनी विकताना सरकारकडे विशिष्ट नजराणा किंवा पैसे भरणे बंधनकारक असते. परंतु, अमेडिया कंपनीने हा व्यवहार करताना सरकारकडे पैसे भरल्याचा कोणताही पुरावा नाही. याव्यतिरिक्त, हा 40 एकर जमिनीचा मोठा भूखंड असल्याने, या व्यवहाराला महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळणे आवश्यक होते. या महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे, हा संपूर्ण जमीन व्यवहार कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरतो.
घाईगडबडीतील खरेदी आणि चौकशीचे सावट
हा जमीन खरेदीचा व्यवहार अत्यंत घाईगडबडीत पूर्ण करण्यात आला. 22 एप्रिल 2025 रोजी अवघ्या दोन दिवसांत हा व्यवहार केला आहे. या सगळ्या संशयास्पद घडामोडींमुळे आता सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधक याला ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ म्हणत आहेत, ज्यामुळे पवार कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.







