Pune News: लोणी काळभोर, ता. 26 : भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून लोकशाहीचा आत्मा आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसचे प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मुल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानामुळे (constitution) लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित आहेत, असे प्रतिपदान प्रमुख वक्ते सोमराज दळवी यांनी केले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात बुधवारी (ता. 26 ) साजरा करण्यात आला. यावेळी सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन वक्ते सोमराज दळवी यांनी केले आहे. यावेळी उपमुख्याध्यापक विलास शिंदे, ज्येष्ठ शिक्षक शशिराव शेंडगे, शर्मिला साळुंखे, महिला पोलीस वनिता पाटील, सुवर्णा केंद्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले, “देशाचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची सर्वांना माहिती व्हावी यादृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापणा करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडुन 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आला आहे.”
यावेळी बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस वनिता पाटील म्हणाल्या की, परकीय आक्रमण असो अथवा देशातील कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे असो. ते रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे. पोलिसांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये घुसून अतिरेकांचा खात्मा केला होता. या हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीर मरण आले होते. वीर गती प्राप्त झालेल्या सर्व जवानांना अभिवादन करते. तसेच कायदा हा संविधानावर चालत आहे. संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहे. त्यामुळे आपण भारतीय नागरिक म्हणून संविधानातील मूल्य व तत्वांचे जतन करण्यासाठी कटिबध्द राहू या. असे आवाहन यावेळी वनिता पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, दयानंद जानराव यांनी संविधानाचे महत्त्व काव्यमय ओळींमध्ये गुंफून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून संविधानाची प्रतिज्ञा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. शिस्त, देशभक्ती आणि संविधानाबद्दलची निष्ठा या त्रिवेणीची अनुभूती देत संविधान दिनाचा हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद जानराव यांनी तर आभार अन्सर पिरजादे यांनी मानले.







