पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसांना आग लागण्याच्या घटनांमध्ये (Pune Fire) आणखी एका घटनेची भर पडली आहे. तळवडे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्लांटजवळ धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते. तळवडे परिसरातून जात असताना चालकाच्या निदर्शनास इंजिनच्या भागातून धूर निघताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काही क्षणांतच बसला भीषण आग लागली. ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः जळून सांगाडा शिल्लक राहिला होता.
या घटनेनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ च्या बसांच्या देखभालीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, मात्र अधिकृत तपासानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.
सार्वजनिक वाहतूक ही शहराची जीवनरेखा मानली जाते. त्यामुळे बसांच्या नियमित तपासणी, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची गरज असल्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.







