पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण करण्याच्या आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत. पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली असली, तरी जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे.सुरुवातीला 5 हजार आंदोलकांसाठी परवानगी मागितल्यानंतर, आता 50 समर्थकांसह शांततेत उपोषण करण्यासाठी पोलिसांकडे नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सर्व नियम आणि अटींचे पालन करण्याचे आश्वासन यात देण्यात आले आहे.

आझाद मैदानावरील उपोषणाला आज दुपारपर्यंत पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर जरांगे पाटील या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.पोलिसांनी पुन्हा नकार दिला, तरीही मी स्वतः एकटा मुंबईत जाऊन उपोषणाला बसेन, तर बाकी समर्थक त्यांच्या सोयीने मुंबईत पोहोचतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील मोजक्या सहकाऱ्यांसह जालन्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मुंबईत पोहोचण्यापूर्वी प्रवासात त्यांचे 3 मुक्काम असतील. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्या ताफ्यासोबत शेकडो पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मुंबई प्रवासाचा मार्ग आधीच जाहीर केला आहे.

दुसरीकडे, मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या असून काही बाबी न्यायालयात प्रलंबित आहेत, असा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, आपल्या मागण्यांवर ठाम राहत उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आता मुंबई पोलीस या नव्या अर्जावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







