लोणी काळभोर, ता. 8 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंतच्या नागरिकांचा प्रवास अक्षरशः मनस्तापाचा ठरत आहे. अतिक्रमणे, वाहतूक पोलिसांचे ठिसाळ नियोजन, बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, रस्त्यावरील खड्डे आणि सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यातच राजकीय नेते आणि प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष असल्याने, ‘ही वाहतूक कोंडी कायमची सुटणार तरी कधी?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हडपसर, शेवाळवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, थेऊर फाटा, नायगाव फाटा आणि उरुळी कांचन येथील तळवडी चौक या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होती. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी तासन्तास खर्ची पडत असल्याने, नागरिकांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.

सेवारस्ते मोकळे कधी होणार?
महामार्गालगत आणि सेवारस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने, अनधिकृत व्यवसाय आणि बेशिस्त पार्किंग यामुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत आहे. महामार्गावरील अतिक्रमणे हटवून सेवारस्ते मोकळे करणे, ही वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची उपाययोजना ठरू शकते.

थेऊर फाट्यावरील नाकाबंदी; वाहतूक कोंडीत भर?
थेऊर फाटा येथे विनाकारण नाकाबंदी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या नाकाबंदीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नाकाबंदी आवश्यक असल्यास ती वाहतुकीला अडथळा न आणता, नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई कधी?
पुणे सोलापूर महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळेही वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालणे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
खड्डे बुजविण्यापासून वाहतूक नियोजनापर्यंत; उपाययोजना होणार कधी?
महामार्गावरील खड्डे बुजविणे, वाहतूक पोलिसांचे नियोजन सुधारणे, अतिक्रमणे हटविणे, सेवारस्ते मोकळे करणे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे, या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, या प्रश्नाकडे राजकीय नेते आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही, तर नागरिकांना दररोज याच समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ‘वाहतूक कोंडी सुटणार तरी कधी?’ या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे.
उपाययोजना झाल्यास कोंडी सुटेल?
अतिक्रमणे हटवून सेवारस्ते मोकळे करणे, वाहतूक पोलिसांचे नियोजन सुधारणे, अवजड व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि बेशिस्त वाहनचालकांना आळा घालणे, या उपाययोजना प्रशासनाने प्रभावीपणे राबविल्यास पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, या उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन न उचलल्याने प्रतिक्रिया समजू शकली नाही.
“मांजरी उपबाजाराच्या लगत काही नागरिक रस्त्यावरच फळविक्री करत आहेत. त्यांना याबाबत कल्पना दिली आहे. तसेच, पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र, कारवाईनंतर पुन्हा फळविक्रेते रस्त्यावर येऊन फळविक्री करतात. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त कारवाई करण्यात येईल.”
(- युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक विभाग)






