पुणे: पुणे शहरात वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रहदारीची कोंडी कमी करणे आणि सामान्य नागरिकांचा प्रवास सुरक्षित करणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

२०२६ मध्ये जड वाहनांशी संबंधित ३० भीषण अपघात झाले असून, त्यात ३१ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशानुसार, १५ जून ते २४ जून या कालावधीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

जड वाहनांना शहराबाहेरच रोखल्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते मोकळे राहतील आणि वाहतुकीचा वेग वाढून अपघातांचे प्रमाण घटेल, अशी खात्री प्रशासनाने व्यक्त केली आहे.
वाहतूक विभागाने सर्व वाहनचालकांना या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या १० दिवसांच्या बंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.






