मुंबई: सध्या जगात आर्थिक मंदीचे सावट असल्याचे बोलले जात असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र अत्यंत वेगाने आणि मजबुतीने प्रगती करत आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या या आर्थिक यशाबद्दल सांगितले. देश आता 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे आपले ध्येय गाठण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. सध्या भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्क्यांहून अधिक असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूण विस्तार आता 345 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे, ही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे भारत आता जगातील एक महत्त्वाची आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे, असे त्यांनी सांगितले.

आज भारताकडे सुमारे 67 लाख कोटी रुपयांचा परकीय चलनाचा साठा असून या साठ्याची ताकद इतकी मोठी आहे की, भारतावर असलेले 94 टक्के विदेशी कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो. एवढेच नव्हे, तर पुढील 11 महिने भारताला लागणाऱ्या सर्व आयातीचा खर्च भागवण्याची क्षमता भारतात असल्याचं ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताला कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा इशारा दिला होता. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षांतील धोरणांमुळे आज भारताची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.






