पुणे, ता. १२ : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश मिळालेल्या आणि प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवार (ता. १२) ही अंतिम मुदत असून, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता ही अंतिम संधी असल्याने पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. नियमित प्रवेश फेरीत ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीत १२ हजार ९४३ आणि दुसऱ्या फेरीत २ हजार ३९७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात आरटीई अंतर्गत अजूनही १२ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विलंब न करता तातडीने प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.






