दौंड : दौंड–पुणे रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. या मार्गावरील सुविधा वाढवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान करण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत दौंड–पुणे मार्गावरील विविध मागण्या मांडण्यात आल्या असून त्यावर लवकर काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या बैठकीला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. यापूर्वी या विषयाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनीही रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे दौंड–पुणे मार्गावर EMU लोकल सेवा सुरू करण्याची होती. सध्या धावणाऱ्या DEMU आणि MEMU गाड्यांच्या ऐवजी जलद EMU सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांचा वेळ वाचेल, तसेच महिला, दिव्यांग आणि प्रथम श्रेणी प्रवाशांसाठी स्वतंत्र डब्यांची सुविधा उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.
याशिवाय पुणे–सोलापूर–वाडी रेल्वेमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली. या प्रकल्पामुळे वाढती रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच DEMU आणि MEMU गाड्यांमध्ये वारंवार होणारे तांत्रिक बिघाड रोखण्यासाठी देखभाल व्यवस्था मजबूत करण्याची गरजही बैठकीत मांडण्यात आली.
सकाळी 6:00 वाजता दौंडहून सुटणारी DEMU गाडी हडपसरऐवजी पुणे जंक्शनपर्यंत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करणे, तसेच 8:20 ते 5:00 या कालावधीत नवीन सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला.
दौंड येथील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम लवकर पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला. या सुविधेमुळे रेल्वे गाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती अधिक प्रभावीपणे होऊ शकणार आहे. बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी EMU लोकल सेवा आणि चौपदरीकरणासह विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ते कार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे दौंड–पुणे मार्गावरील प्रवाशांना भविष्यात अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






