पंढरपूर : आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्नसुरक्षेबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सोलापूर विभागाने शहरातील विविध हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन आढळल्याने तीन हॉटेल्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील एकूण २१७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण विक्रेते, खानावळी तसेच प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश होता. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे १७२ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने शेगाव दुमाला येथील मंगलमूर्ती मिसळ व भेळ, हॉटेल स्वरा अँड चायनीज सेंटर आणि हॉटेल श्री विष्णू सहस्रनाम या तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच त्यांच्या व्यवसाय परवान्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वारीच्या काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू नये, यासाठी प्रशासनाकडून अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक, वापरले जाणारे खाद्यतेल आणि इतर घटकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
याशिवाय, हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे, परिसर स्वच्छ ठेवावा आणि ग्राहकांसाठी मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६३५ वर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







