उरुळी कांचन, (पुणे) : घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. शनिवारी (ता. 19) रात्री साडेबारा ते सव्वा एक वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील गोळेवस्ती येथे ही घटना घडली.

याप्रकरणी शेतकरी मानसिंग संभाजी गोळे (वय -67, व्यवसाय- शेती, रा. गोळे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसिंग गोळे हे कुटुंबासहित गोळे वस्तीत एकत्र राहतात. त्यांचा मुलगा आशिष हा नोकरीनिमित्त मुंबईला राहत असल्याने मानसिंग गोळे हे बुधवारी (ता. 17) दुपारी 12 वाजता त्याला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने फोन करून सांगितले कि, “तुमच्या घरातील एक बॅग आमच्या शेतात पडली आहे, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून कुलूप-कोयंडा तुटलेला आहे, तसेच आतील सामान अस्ताव्यस्त पडले आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजता मानसिंग गोळे घरी पोहोचले, तेव्हा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला होता. घरात प्रवेश केला असता, चोरट्याने बेडरूममधील 3 कपाटे, किचन शेजारील खोलीतील 1 मोठे कपाट आणि देवघरातील 1 कपाट अशी एकूण 5 कपाटे उचकटून आतील सर्व सोने, नाणी आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले.
दरम्यान, गोळे यांनी आपल्या मोबाईलवरून घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्याने घरात घुसून ही घरफोडी केल्याचे समोर आले. या घटनेत दोन लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा तब्बल 3 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे चोरट्याचा माग काढला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऐजीनाथ शिंदे करीत आहेत.







