खेड: पुण्यातील खेड तालुक्यातील महाळुंगे परिसरात एका कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित मुलीची महत्त्वाची कागदपत्रे आणि ओळखपत्रे आणण्यासाठी गेलेल्या पित्यावर जावयाने आणि त्याच्या भावाने मिळून जीवघेणा हल्ला केला. या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तात्याराव तायडे यांची मुलगी प्रीती आणि तिची बहीण चैत्राली, प्रीतीचे पती रवी सावळे यांच्या घरी कागदपत्रे घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, रवीने प्रीतीला घरातठेवले आणि तिला कोठेही जाण्यापासून रोखले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रीतीने तातडीने वडील तात्याराव यांना मदतीसाठी बोलावले. तात्याराव तिथे पोहोचताच रवी आणि त्याचा भाऊ अतुल यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रवीने रागाच्या भरात घरातील ‘कूकर’ उचलून सासऱ्याच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात तात्याराव गंभीर जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर जखमी तात्याराव यांनी थेट महाळुंगे पोलीस चौकी गाठून जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३८ वर्षीय रवी सावळे आणि ३० वर्षीय अतुल सावळे या दोघा भावांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादातून झालेला हा हिंसक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.






