चाकण: चाकण शहर आणि परिसरात वाढलेली वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे आणि अनियंत्रित पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आता विविध विभागांना सोबत घेऊन ठोस नियोजन सुरू केले आहे.

चाकणमधील वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह PWD, MIDC, NHAI, वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते. रस्त्यांची स्थिती सुधारण्यापासून वाहतुकीचे नियमन करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित कामांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी आधीच पर्यायी मार्गांची आखणी केली जाणार आहे. मोठ्या वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच गरज भासल्यास छोट्या वाहनांसाठी काही भागात एकेरी वाहतूक सुरू केली जाऊ शकते. वाहनचालकांना मार्ग बदलाची माहिती वेळेत मिळावी यासाठी कामाच्या ठिकाणापासून 2 ते 3 किमी आधी सूचना फलक लावण्याचे नियोजन आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी AI आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. नियम मोडणाऱ्यावर ई-चलान आणि दंडाची कारवाई करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरीकडे जोडणाऱ्या मार्गांची दुरुस्ती करण्यावर भर दिला जाणार आहे. औद्योगिक कंपन्या आणि वाहतूक संस्थांनी त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.







