बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाताचा अंत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज बारामतीच्या मातीत विलीन होणार आहे. मात्र, काल सकाळी मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावरून निघताना नियतीने आपला डाव आधीच आखला होता की काय, असा प्रश्न पडावा अशा काही घटना समोर येत आहेत. विशेषतः विमानात बसण्यापूर्वी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झालेला त्यांचा शेवटचा संवाद आता अत्यंत भावूक ठरत आहे.

बुधवारी बारामतीत अजितदादांच्या चार महत्त्वपूर्ण सभा होत्या. कामाचा प्रचंड उरक असलेल्या दादांनी नेहमीप्रमाणे पहाटेच आवरले होते. देवगिरी बंगल्यावर नाश्ता करत असताना त्यांनी खासदार असलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना फोन लावला. दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने दोघांमध्ये त्याविषयी चर्चा झाली. “आज राष्ट्रपतींचे अभिभाषण आहे, ते अत्यंत लक्ष देऊन ऐक,” असा मोलाचा सल्ला त्यांनी सुनेत्रा पवारांना दिला. हा सल्ला केवळ पती म्हणून नाही, तर एका अनुभवी राजकीय मार्गदर्शकाने आपल्या सहकाऱ्याला दिलेला शेवटचा संदेश ठरला.

सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अजित पवार देवगिरीवरून मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. सुरुवातीला त्यांचा मोठा ताफा सोबत होता, मात्र विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी आपल्या पीए आणि इतर कर्मचाऱ्यांना परत पाठवले. केवळ सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना सोबत घेऊन त्यांनी स्पेशल चार्टर विमानाने बारामतीकडे उड्डाण केले.
अजित पवार हे शिस्तीसाठी ओळखले जात. शेवटच्या क्षणीही त्यांच्या डोक्यात राजकारण आणि समाजकारणाचेच विचार होते, हे सुनेत्रा पवारांशी झालेल्या संवादातून स्पष्ट होते.







