उरुळी कांचन, (पुणे): उरुळी कांचनच्या मुख्य गावात, पोलीस ठाणे, डाळिंब रोड परिसर, गिरमे वस्ती आणि पुरंदर सोसायटी परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचे वास्तववादी; पण बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अफवेमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

उरुळी कांचनच्या मुख्य गावात, गिरमे वस्ती आणि पुरंदर सोसायटी परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा गुरुवारी रात्री वाऱ्यासारखी पसरली. मात्र, ही खरी घटना नसून केवळ ‘लांडगा आला रे आला’ सारखी अफवा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनवलेले बनावट फोटो सोशल मीडियावर पसरवून निर्माण केलेला बनाव असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

हे फोटो खरे की खोटे याची सहनीशा अद्याप झाली नसून तसेच कोणतेही सीसीटीव्ही फुटेजची माहिती अद्याप समोर आली नाही, त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणे ऐन सणासुदीच्या काळात व्हॉट्सॲप ग्रूपवर कथित फोटो व्हायरल केले का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून उरुळी कांचन परिसरातील विविध व्हॉट्सॲप ग्रूपवर एका रात्रीत बिबट्याचे कथित फोटो व्हायरल झाले.

“पोलीस ठाण्यामागे बिबट्या दिसला,” असा दावा करत काही जणांनी AI च्या साहाय्याने तयार केलेले बिबट्याचे बनावट फोटो फिरवायला सुरुवात केली. सदर फोटो पाहिल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना सतर्क राहण्याचे मेसेज पाठवले. भीतीपोटी लोकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतले, तर अनेक नागरिकांनी पोलीस व वन विभागाकडे चौकशीसाठी फोन फिरवले.
मुख्य गावात बिबट्या आल्याच्या बातमीने पोलीस आणि वन विभागाची चांगलीच धावपळ उडाली. वन विभागाच्या पथकाने तातडीने पुरंदर सोसायटी व गिरमे वस्ती परिसरात जाऊन पाहणी केली. मात्र, घटनास्थळी बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा इतर कोणताही प्रत्यक्ष पुरावा आढळून आला नाही. व्हायरल झालेले फोटो हे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एडिट केलेले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर ‘डिजिटल चाबूक’ उगारणार?
उरुळी कांचन, सोरतापवाडी आणि पूर्व हवेली परिसरात खरंच बिबट्याचा वावर वेळोवेळी दिसून आलेला आहे. अशा गंभीर परिस्थितीत बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या नावाने बनावट AI फोटो बनवून नागरिकांमध्ये नाहक दहशत निर्माण करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. “सोशल मीडियावर एआय किंवा फोटो एडिट करून बिबट्याची खोटी बातमी पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांचा शोध घेऊन त्यांच्यावर सायबर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत,” अशी जोरदार मागणी उरुळी कांचनच्या सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत बोलताना वनरक्षक संभाजी गायकवाड म्हणाले, “ज्या ठिकाणी बिबट्या आला त्या ठिकाणी तास ते दीड तास्पाहणी केली मात्र कोठेही ठसे अथवा संशयित काही आढळून आले नाही. सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे, की बिबट्याचा कोणताही वावर आढळलेला नाही. फोटो ‘एआय’च्या सहाय्याने बनविले गेले आहेत. ज्यांनी असे फोटो बनवून सोशल मिडीयावर टाकले अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तपासणी करून माहिती समाज माध्यमांवर पाठवावी. अन्यथा गुन्हे दाखल केले जातील.”






