Rajya Sabha Election: नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे देशातील राजकीय वातावरण तापले असून विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. देशातील 10 राज्यांमधील एकूण 37 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून महाराष्ट्रातील 7 महत्त्वाच्या जागांचा यामध्ये समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही तर मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि निकाल जाहीर केले जातील.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार महायुतीला 7 पैकी सुमारे 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उर्वरित 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यातील 7 खासदार होणार निवृत्त
एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भगवत कराड, फौझिया खान, रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे.
पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात जर पार्थ पवार यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला, तर त्यांच्या राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात पक्षनेतृत्व असून, त्यामध्ये पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याचा थेट परिणाम पार्थ पवारांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






