उरुळी कांचन, (पुणे) : इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल का, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन परिसरात नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती स्थानिक गॅस एजन्सीकडून देण्यात आली आहे.

उरुळी कांचन येथील सुरानंद एचपी गॅस एजन्सीचे संभाजी बापू कांचन यांनी सांगितले की, व्यावसायिक वापराच्या काही सिलिंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाला असला तरी घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सध्या परिसरात गॅसचा तुटवडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलिंडर बुक करत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे उरुळी कांचन आणि आसपासच्या भागातून रोज 250 ते 300 गॅस बुकिंग होत होती. पण सध्या ही संख्या वाढून सुमारे 800 ते 900 पर्यंत पोहोचली आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही ठिकाणी तात्पुरता ताण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, भिगवण आणि यवत परिसरातही गॅसबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी नागरिक पहाटेपासून गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडक उन्हातही अनेक नागरिक तासन्तास सिलिंडर मिळण्याची वाट पाहत उभे राहत आहेत.
गॅस एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी 21 ऐवजी 25 दिवसांनंतर करता येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक लवकरात लवकर सिलिंडर रिफिल करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याने वितरणात थोडा विलंब होऊ शकतो.
व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने काही हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॉटेल व्यावसायिक ओंकार रानवडे यांनी सांगितले की, बुकिंग करूनही व्यावसायिक गॅस मिळत नाही. ही स्थिती आणखी काही दिवस राहिली तर हॉटेल बंद ठेवावे लागेल. महागाईमुळे आधीच अडचणीत असलेल्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
बुकिंग करूनही व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाहीत. आणखी दोन ते तीन दिवस गॅस उपलब्ध नाहीत झाले तर हॉटेल बंद करून घरी बसावे लागेल. अगोदरच खाद्य तेल व वाढती महागाई यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेल बंद झाले तर कामगारांवरही उपासमारीची वेळ येणार आहे,
ओंकार रानवडे, हॉटेल व्यावसायिक, हॉटेल सोनाई व्हेज
पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ?
गॅसचा तुटवडा कायम राहिला आणि वेळेत सिलिंडर उपलब्ध झाले नाहीत तर अनेक कुटुंबांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र ग्रामीण भागात वीजपुरवठ्याच्या अडचणी लक्षात घेता काही महिलांवर पुन्हा एकदा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ शकते. आधुनिक सुविधांच्या युगात पुन्हा धुराच्या चुलीकडे वळण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा गृहिणींकडून व्यक्त होत आहे.
सौ. शुभांगी जगदाळे, तक्रारवाडी







