पुणे : सूड उगवण्याच्या उद्देशाने आखण्यात (Pune Crime) आलेला संभाव्य खुनाचा कट पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने वेळेत उधळून लावला आहे. ‘शार्प शुटर’ला सुपारी देऊन गावठी पिस्तुल उपलब्ध करून देण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून इतरांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय 26, रा. दांडेकर पुल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सिंधु ऊर्फ आक्का धोत्रे, सिन्नु झरेकर, पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रोड, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अप्पर बिबवेवाडी) आणि बापू कांबळे (रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी गणेश रेणुसे हा सध्या जामिनावर बाहेर असल्याचे समोर आले आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, संतोष साळुंखे हा सूड उगवण्यासाठी गणेश रेणुसेवर हल्ला करू शकतो, अशी भीती रेणुसेच्या नातेवाईकांना वाटत होती. त्यामुळे आधीच त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. यासाठी गावठी पिस्तुल खरेदी करून ते चेतन जाधव याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर ठरावीक रक्कम देण्याचेही ठरले होते, अशी कबुली चेतन जाधवने चौकशीदरम्यान दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे आणि त्यांच्या पथकाला बातमीदारामार्फत या कटाची माहिती मिळाली. त्यानुसार दांडेकर पुल परिसरात सापळा रचण्यात आला. मांगीरबाबा चौक येथे संशयित हालचाली करत असताना चेतन जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून शस्त्रसाठा आणि इतर पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे एक संभाव्य खून टळला असून शहरात मोठी गुन्हेगारी घटना घडण्यापासून रोखण्यात यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.







