अमित मुंडीक

पुणे : प्रवाशांना (Pune Crime) रात्रीच्या वेळी रिक्षामध्ये बसवून (Pune News) निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका रिक्षाचालकासह दोन विधीसंघर्षित बालकांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने अनेक प्रवाशांचे मोबाईल आणि रोकड लुटल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 3,70,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात तब्बल 30 मोबाईल फोनचा समावेश आहे.
वानवडी पोलिसांच्या तपास पथकाला माहिती मिळाली की, हडपसर येथील नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर शेजारील कच्च्या रस्त्यावर काही इसम रिक्षामध्ये थांबून चोरीचे मोबाईल विक्रीसाठी ठेवत आहेत. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, नमूद रिक्षा (क्र. MH-12-VB-9420) आढळून आली. पोलिसांनी कारवाई केल्यावर आरोपींनी रिक्षा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये फैजान मोहम्मद गौस शेख (रा. उरुळी देवाची, पुणे) आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तपासात आरोपींकडून ग्रे कलरचा विवो मोबाईल हॅन्डसेट आणि रिक्षाच्या डिक्कीत लपवलेला चाकू जप्त करण्यात आला.
चौकशीत फैजान शेख याने कबुली दिली की, दोन महिन्यांपूर्वी पैशांची गरज असल्याने त्यांनी रिक्षामधून पुणे स्टेशनवर प्रवासी उचलले. प्रवाशाला शिवाजीनगर येथे नेण्याचे सांगून त्याला रिक्षेत बसवले आणि टर्फ क्लब, रेसकोर्स रोड, भैरोबानाला येथे निर्जन ठिकाणी नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड लुटून घेतली.
या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि 80,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात आरोपींकडून आणखी 29 मोबाईल मिळाले ज्यांची किंमत 2,90,100 रुपये इतकी आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 30 मोबाईल हॅन्डसेटसह 3,70,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमूद आरोपीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात गु.र.नं. 306/2025, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) आणि 3(5), गु.र.नं. 400/2025, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) आणि 3(5), तसेच गु.र.नं. 290/2021, भादंवि कलम 379 या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलिसांची कारवाई
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे तसेच महिला पोलीस अंमलदार सुजाता फुलसुंदर यांचा समावेश होता.







