पुणे: पुण्यातील वडगाव शेरी परिसरात नवीन मोटारगाडी खरेदीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे 7 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन लहान मुलांचाही समावेश असून, सर्वांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, वडगाव शेरी येथील गुडविल वृंदावन सोसायटीमध्ये शुक्रवारी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. एका कुटुंबाने नवीन मोटारगाडी खरेदी केल्याच्या आनंदात स्थानिक मिठाई दुकानातून पेढे आणून नातेवाईक आणि परिचितांना वाटले होते. हे पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच 7 जणांना उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला.

प्रकृती बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये आरुष अजित नवसरे (वय 14) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर रुग्णांवर कोरेगाव पार्क येथील बुधराणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर आरुषच्या नातेवाईक अॅड. अश्विनी शेवाळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच एफडीएच्या पुणे विभागाने तातडीने कारवाई सुरू केली.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली. तसेच ज्या मिठाई दुकानातून पेढे खरेदी करण्यात आले होते, तेथे जाऊन तपासासाठी पेढ्यांचे नमुने जप्त केले आहेत. या पेढ्यांमुळे विषबाधा नेमकी कशामुळे झाली, त्यामध्ये कोणती भेसळ किंवा अन्य दोष होता का, याचा तपास सुरू असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून अन्नपदार्थ खरेदी करताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






