पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या बाह्यवळण रिंग रोडभोवती असलेल्या ११७ गावांच्या विकासाला आता नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे. या गावांचा सविस्तर विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वेगाने सुरू आहे. या गावांमधील सध्याच्या जमिनींच्या वापराचे सर्वेक्षण (ईएलयू) पूर्ण झाले असून, भविष्यातील विकासासाठी आवश्यक प्रकल्प आणि त्यासाठी लागणाऱ्या जागांचे नियोजन (पीएलक्यू) अंतिम टप्प्यात आहे. पुढील चार महिन्यांत हा विकास आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्य सरकारने सुमारे दोन वर्षांपूर्वी या ११७ गावांसाठी एमएसआरडीसीला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी दिली आहे. हवेली, भोर, पुरंदर, वेल्हे आणि मुळशी या तालुक्यांतील गावांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्यासाठी हा आराखडा तयार केला जात आहे.

या विकास आराखड्यात पुरंदर विमानतळाजवळील सासवड आणि सिंहगड किल्ला परिसर ही दोन प्रमुख ‘ग्रोथ सेंटर’ म्हणून विचारात घेतली जात आहेत. रिंग रोडमुळे या भागांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर होणारे नागरीकरण, व्यवसायवाढ आणि पर्यटनाचा विस्तार लक्षात घेऊन जमिनींच्या वापराचे नियोजन केले जाणार आहे.

मुळशी तालुक्यातील बहुतांश भाग डोंगर-दऱ्यांचा असल्याने पर्यटन विकासाला विशेष प्राधान्य देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर औद्योगिक हब आणि लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य जागा निश्चित केली जाणार आहे. विकास आराखडा केवळ रस्ते आणि बांधकामांपुरता मर्यादित न ठेवता पाणीपुरवठ्याच्या टाक्या, क्रीडांगणे, खुल्या जागा, स्मशानभूमी, अग्निशमन केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठीही जागा आरक्षित करण्याचे नियोजन आहे.
जागा निश्चित करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जाणार असून, रिंग रोडवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांचा संबंधित गावांच्या विकासावर होणारा परिणामही आराखड्यात विचारात घेतला जाणार आहे. सध्याच्या आराखड्यात मेट्रोचा समावेश नसला, तरी भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्याचाही विचार केला जाऊ शकतो.






