पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाचा मुलगा ईशान कक्कर याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी उकळल्याच्या गंभीर आरोपांखाली दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिल्लीतील भारतनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित तरुणी सध्या २५ वर्षांची असून पुण्यातील एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. तिच्या कुटुंबाचे २०१३ मध्ये पुण्यात स्थलांतर झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ती काही काळ दिल्लीतील नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी तिची ईशान कक्कर याच्याशी ओळख झाली.

तक्रारीनुसार, मे २०१४ मध्ये ईशान दिल्लीतील नातेवाईकांच्या घरी गेला होता. त्याने पीडितेला गाडीने बाहेर फिरायला जाण्यास सांगितले. त्यानंतर तिला अशोक विहार परिसरातील बाबा खिम्मन सिंह पार्क येथे नेण्यात आले. तेथे ईशानने प्रेमसंबंधाचा प्रस्ताव दिला. पीडितेने नकार दिल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यावेळी भीती आणि लज्जेमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. त्या वेळी पीडिता १३ ते १४ वर्षांची होती.

तक्रारीनुसार, या घटनेला अनेक वर्षे उलटल्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये ईशानने पुन्हा पीडितेशी संपर्क साधला. त्यावेळी ती गाझियाबाद येथे नातेवाईकांकडे होती. ईशानने फोन करून संपर्कात राहण्यास सांगितले आणि भेटण्यासाठी दिल्लीला येण्यास सांगितले. काही कारण सांगून त्याने ५० हजार रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
त्यानुसार पैशांची व्यवस्था केल्यानंतर ईशानने तिला वझीरपूर परिसरात बोलावले. पीडिता कन्हैयानगर मेट्रो स्थानकावर पोहोचल्यानंतर ईशान कार घेऊन तेथे आला. त्याने तिला कारमध्ये बसवून पुढे नेले आणि पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने या प्रकाराला विरोध करत आरोपीला जाब विचारल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
२०१४ आणि २०२२ या दोन्ही घटनांबाबत पीडितेने अखेर ५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास भारतनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक बिंदू करत आहेत.
पीडितेच्या आईने आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा मुलीच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला असून संपूर्ण कुटुंबाला मानसिक धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.








