मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. राज्यातील 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण 5 हजार 86 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची प्रक्रिया पार पडली.

यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांशी संबंधित चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल व वन तसेच विधि व न्याय विभागाच्या निर्णयांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू तसेच त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या रोख बक्षिसांच्या धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनात वाढ होण्याची शक्यता आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित निर्णयात नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या शाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी मौजे जत येथील 2 हजार 585 चौरस मीटर शासकीय जमीन देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती तसेच संबंधित खर्चाच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासह या चार निर्णयांमुळे आजची मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची ठरली आहे.







