पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातील एका प्रार्थनास्थळात प्रार्थनेद्वारे कर्करोग, ट्यूमर यांसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा केल्याप्रकरणी एका धर्मगुरुसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील एका महिला कार्यकर्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 32 वर्षीय महिला येरवडा परिसरात राहतात. त्या आणि त्यांची एक मैत्रीण रविवारी, 14 जून रोजी संबंधित प्रार्थनास्थळी गेल्या होत्या. तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी 20 रुपये घेऊन त्यांना प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले. तसेच हे पाणी शरीराच्या आजारी भागावर लावल्यास आजार कमी होईल, असे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर धर्मगुरूंनी सभेत उपस्थितांना संबोधित करताना विविध आजारांवर प्रार्थनेद्वारे उपचार होऊ शकतात, असा दावा केल्याचे म्हटले आहे. शरीराच्या ज्या भागात आजार असेल त्या भागावर उजवा हात ठेवावा आणि देवाच्या कृपेने कर्करोग, ट्यूमर यांसारखे विकारही दूर होतील, असे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, तक्रारदार महिला आणि त्यांच्या मैत्रिणीने या कार्यक्रमाचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र, तेथील काही महिला स्वयंसेवकांनी त्यांना चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याशी धक्काबुक्की करून मोबाईलमधील व्हिडिओ हटविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी धर्मगुरुसह 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले करत आहेत.







