पुणे, ता. 18 : पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण, विनंती व अंशतः बदल्यांना तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, बदलीचे आदेश होऊनही अनेक अधिकारी व कर्मचारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होता जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या बदली प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून कार्यमुक्त केले जात नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांनी विनंती बदली किंवा अंशतः बदलीचे कारण पुढे केले आहे. तर काही कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाची खाती किंवा संवेदनशील जबाबदाऱ्या असल्याने त्यांना सोडण्यास संबंधित वरिष्ठ अधिकारी तयार नसल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे ‘बदलीचे आदेश कोणासाठी?’ आणि ‘आदेशांची अंमलबजावणी कोण करणार?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी 6 जून आणि 10 जुलै रोजी सर्वसाधारण, विनंती व अंशतः स्वरूपाच्या बदल्यांचे आदेश काढले. या आदेशांमध्ये शाखांसह जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील 33 पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या 450 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यापैकी केवळ १० ते 20 टक्के अधिकारी व कर्मचारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले, तर तब्बल ८० टक्क्यांहून अधिक कर्मचारी अद्यापही जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढलेल्या बदली आदेशांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये कितपत गांभीर्याने घेतले जाते, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दूरध्वनीवरील कॉलला प्रतिसाद न दिल्याने या प्रकरणाबाबत त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
‘वसुली’च्या चर्चेने बदली प्रक्रियेलाच ग्रहण?
दरम्यान, काही कर्मचारी विशिष्ट ठिकाणी दीर्घकाळ राहण्यासाठी इच्छुक असल्याने तसेच काहींना महत्त्वाच्या खात्यांमधून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामे मिळत असल्याच्या चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहेत. ‘वसुली बहाद्दर’ कर्मचाऱ्यांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. बदली झाल्यानंतरही कर्मचारी जुन्याच ठिकाणी कायम राहणार असतील, तर सर्वसाधारण बदली प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. बदलीच्या आदेशांना केराची टोपली दाखविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार कोण, याकडे आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एसपी गिल कारवाई करणार का?
बदलीचे आदेश जारी करूनही संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर तसेच आदेशांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल काय कारवाई करणार? बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी नेमके कधी हजर केले जाणार? आणि बदली प्रक्रियेत कोणाला अभय दिले जात आहे का? बदली आदेशाला दोन महिने उलटूनही कर्मचारी जुन्याच ठिकाणी कायम राहणार असतील, तर प्रशासनाच्या आदेशाला किंमत काय? असा सवाल आता ग्रामीण पोलीस दलातच दबक्या आवाजात उपस्थित होत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणी तातडीने काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






