महेंद्र शिंदे
खेड शिवापूर, ता. ३१ : “उद्योग टिकले तरच या भागातील स्थानिक नागरीक आणि कामगार वर्ग जगणार आहे. त्यामुळे उद्योग व्यावसायिकांच्या असलेल्या अडचणी पाठपुरावा करून नक्कीच सोडविण्यात येतील,” असे आश्वासन भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी आज येथे दिले.
वरवे (ता.भोर) येथे आमदार मांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-सातारा महामार्ग पट्ट्यातील उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अडचणी बाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मांडेकर बोलत होते. भोरचे प्रांताधिकारी डॉ. विजय खरात, तहसिलदार राजेंद्र नजन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, माजी जिल्हा परीषद सदस्य विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, अमोल बबन पांगारे, ज्ञानेश्वर पांगारे, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, उद्योजक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
“अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी देवाण घेवाण असलेल्या कंपन्या आपल्या भागात आहेत. मात्र औद्योगिक पट्ट्यातील अंतर्गत रस्ते अतिशय खराब आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम ताबडतोब मार्गी लागावे, तसेच अपुरा वीज पुरवठा असल्याने उद्योग व्यवसाय चालविण्यात अडचणी येत आहेत,” असे मत यावेळी अनेक उद्योजकांनी मांडले. तसेच वेळू परिसरात झालेल्या सेवा रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले, “उद्योग व्यवासायिकांच्या असलेल्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच त्या अडचणीबाबत स्वत: लक्ष घालून त्या अडचणी सोडविण्यात येतील. उद्योग वाढले मोठे झाले तरच आपल्या भागाचा विकास होणार आहे. हे लक्षात ठेवून सर्वांनी आपल्या भागातील उद्योग व्यवसायांना सहकार्य केले पाहिजे.”
चंद्रकांत बाठे आणि अमोल बबन पांगारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.







