पुणे: आज सायंकाळी पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण (Navale Bridge Accident) अपघात झाला. या (Pune News) अपघातामध्ये सुमारे 7 ते 8 वाहनांचा (Devendra Fadanvis) समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही अहवालांनुसार या अपघातात एकूण 15 ते 20 वाहनांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर भुमकर पुलाजवळ एक कंटेनरचे नियंत्रण अचानक सुटले. त्याने पुढे असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये एक ट्रॅव्हलर बस पलटी झाली. त्या बसमध्ये सुमारे 18 ते 20 प्रवासी होते. सुदैवाने बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आणि मोठी जीवितहानी टळली.
मात्र पुढे उभ्या असलेल्या एका सीएनजी कारला कंटेनरने जबर धडक दिली, ज्यामुळे ती कार दोन कंटेनरमध्ये अडकली. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने भयंकर रूप धारण केले. या कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती असून, त्यामध्ये दोन पुरुष, एक महिला आणि सुमारे 4 ते 5 वर्षांचे एक लहान मूल अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच कंटेनरमधील चालक आणि क्लिनर यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या भीषण घटनेनंतर पुणे आणि पीएमआरडी अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू केले असून, हे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवून नागरिकांना त्या मार्गावरून जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार कंटेनरचे ब्रेक फेल होणे किंवा चालकाचे नियंत्रण सुटणे हेच अपघाताचे कारण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.






